पालघर, प्रतिनिधी : आधार कार्डासारख्या महत्त्वाच्या ओळखपत्रापासून वंचित राहिलेल्या १४५ आदिवासी नागरिकांच्या प्रश्नावर अखेर श्रमजीवी संघटनेने आक्रमक भूमिका घेत पोशेरा ग्रामपंचायतीसमोर आंदोलन छेडले. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.

आंदोलनादरम्यान नागरिकांनी आधार नोंदणी व दुरुस्ती प्रक्रियेमधील अडचणी, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे निर्माण झालेल्या समस्या आणि विविध शासकीय योजनांपासून होत असलेली वंचना याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
आंदोलनाची दखल घेत संबंधित प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आंदोलकांसोबत चर्चा केली. यावेळी प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. प्रशासनाच्या या भूमिकेनंतर आंदोलकांनी समाधान व्यक्त केले.
आधार कार्ड नसल्यामुळे अनेक आदिवासी नागरिकांना शासकीय योजना, शैक्षणिक सुविधा, आरोग्य सेवा तसेच इतर महत्त्वाच्या लाभांपासून वंचित राहावे लागत असल्याची बाब यावेळी समोर आली. त्यामुळे हा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली.
श्रमजीवी संघटनेच्या या आंदोलनामुळे आदिवासी नागरिकांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून, दिलेल्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी कितपत होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

